पुणे – “क्यार’ वादळाची तीव्रता संपल्यानंतर आता पुन्हा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचे रुपांतर छोट्या चक्रीवादळात होणार असल्याने शुक्रवारपासून राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार’ वादळाची तीव्रता कमी झाली असून ते आता ओमनच्या दिशेने सरकले आहे. त्यातच केरळ आणि लक्षद्विप बेटांच्या जवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या लगत सरकल्याने या राज्यांमधील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर कमी तीव्रतेच्या चक्री वादळात होणार असल्याने राज्यातील विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगत ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार आहे.
सध्या दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत आहे. ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा विविध भागांत वादळी वारे मेघगर्जना, विजासह पाऊस पडत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने तापमान तिशीपार गेले आहे. पुढील काही दिवस दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.