वाई – करोनाबाधितांची संख्या देशात विशेषत: राज्यात वाढत असल्याने 14 एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊनचे आदेश आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. मात्र, गुरुवारी वाई शहरात अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. दरम्यान, कोणत्याही कारणास्तव गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने आता दंडुक्याचा धाक दाखविण्यापेक्षा पोलिस प्रशासनाने गर्दी करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
करोनामळे लॉकडाऊन लागल्याने 24 तास धावपळ करणाऱ्या चाकरमान्या लोकांना हे पचनी पडताना अवघड जात आहे. नेहमीच गडबडीत असणाऱ्या माणसाला संपूर्ण दिवसभर घरात बसवून ठेवणे सोपे नाही. परंतु, त्याबाबतच्या अफवांमुळे घरात बसलेला माणूस मानसिक दडपणाखाली वावरत आहे. त्यामुळे महिनाभर हाच नित्यक्रम सुरू राहिल्यास मानसिक रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरातून बाहेर कामानिमित्त जरी पडला तरी पोलीस कसलीही चौकशी न करताच दंडुक्याचा प्रसाद देत आहेत.
ज्येष्ठ नागरिकसुध्दा पोलिसांच्या प्रसादातून वाचलेले नाहीत, ज्याचे हातावर पोट आहे, ज्याच्या घरात रोज कमविल्याशिवाय चुलच पेटत नसेल त्या लोकांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. झोपडपट्टीतील कित्येक कुटुंबातील सदस्य उपाशी झोपले, त्यामुळे कसलीही पर्वा न करता रोजंदारी करणारा बाहेर पडला आहे.
करोनाचा गैरफायदा घेत पोलिसांनी कोणालाही प्रसाद देण्यापासून सोडले नाही. शेतकरी, दुधवाला, जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर आलेले नागरिक, बॅंकेचे कर्मचारी, फिरावयास आलेले ज्येष्ठ नागरिक या सर्वांना पोलिसांचा महाप्रसाद मिळाला आहे. आगाऊपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत, त्यामुळे जनतेशी योग्य समन्वय साधल्यास नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. दंडुक्यापेक्षा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यास मुख्यमंत्री सहाय्य निधीला मोलाची मदत मिळेल.
वाई शहरात जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरु करण्याची योजना सुरू केली असली तरी त्याला हवे तसे यश आलेले नाही. आजही किराणा मालाच्या दुकानासमोर, भाजीच्या गाड्यासमोर, पेट्रोल पंपावर तुफान गर्दी होताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत, जीवनावश्यक दुकाने 24 तास चालू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने काहीसा जनतेला दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना शेतातील कामे व शेतमालाचे बाजारापर्यंत वाहतूक करण्याची परवानगी, दुधाची विक्री करणाऱ्या दुधवाल्यांना पोलीसांनी त्रास देवू नये, अशाही सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
महसूल विभाग, सरकारी कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. तरीही सूक्ष्म नियोजनाची गरज आहे, परिस्थितीचा फायदा घेवून काही किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी जादा फायदा मिळवीत आहेत, त्यांच्यावरसुध्दा कारवाई होण्याची गरज आहे.