नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सुरु आहे. यात सर्व पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातच काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.
“काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला भोगावं लागत आहे,” अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसची ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ते मालविका अविनाश यांनी फक्त काँग्रेसच्या इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकते अशी टीका केली आहे. तसेच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस प्रवक्ता लावण्य बल्लाल यांनी हे ट्वीट दुर्दैवी असून याची चौकशी केली जाईल असं सांगितले आहे. मात्र त्यांनी हे ट्वीट माघारी घेण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचेही सांगितले आहे. कर्नाटकात ३० ऑक्टोबरला दोन ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. जनता दल सेक्यूलर आणि भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जागांवर निवडणुका होत आहे.