सातारा – राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षात सत्ता स्थापन करण्यावरून सध्या तणावाचे वातावरण असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तिढा सुटेपर्यंत रामदास आठवलेंना मुख्यमंत्री करा, असा उपरोधीक सल्ला देत जिल्ह्यात मंत्रीपद देताना चिठ्ठ्या टाकूनच द्या अशी कोपरखळी त्यांनी मारली. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही सत्तेच्या वाट्यावरून या दोन्ही पक्षात सध्या कमालीचे वैरत्व आले आहे. नेमका मुख्यमंत्री कुणाचा, महत्वाची खाती कुणाला यावरून विधानसभेचा निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी तिढा कायम आहे. त्यावर बोलताना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी हा तिढा सुटेपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती. तसेच सध्या साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे, पाटणचे आमदार शंभुराज देसाई यांच्यात चढाओढ लागली आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात माजी खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता उदयनराजे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलने उत्तरे दिली. सध्याच्या घडामोडींवर काय सांगाल असे विचारता, उदयनराजे म्हणाले माझं मला पडलय अन् ते मला काय विचारता, रामदास आठवले म्हणत आहेत तर करा मग त्यांनाच मुख्यमंत्री असे सांगताना त्यांनी जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने चिठ्ठ्या टाकून मंत्रीपद द्यावे असा सल्ला दिला.