राखवासीयांच्या वतीने सत्कार : “हर घर जल’ जलजीवन मिशनअंतर्गत साडेबारा कोटी मंजूर
वाल्हे : राख (ता. पुरंदर) गावासाठी “हर घर जल’ जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी 57 लाखांचा निधी मंजूर झाल्याबद्दल जलशक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीने घोंगडी व फेटा देत भिवरीत सत्कार केला.
राख गावासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून, दुष्काळी पट्ट्यातील या गावासाठी “जलजीवन मिशन अंतर्गत’ इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे प्रत्येक घरांमध्ये नळ “हर घर जल’ हे पंतप्रधान यांचे ध्येय असून, या योजनेचा लाभ राख गावांसाठी होणार असून, राख व वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील या दुष्काळी भागातील या गावात उन्हाळ्यामध्ये टॅंकर शिवाय तसेच स्थानिकांच्या डोक्यावरील हांडे व सायकलवरील ड्रमशिवाय येथील जनतेला दुसरा पर्याय नव्हता; परंतु योजनेमुळे नागरिक समाधानी आहे, असे पुरंदर तालुका भाजपा उपाध्यक्ष सूर्यकांत रणनवरे यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, आमदार राहुल कुल, पश्चिम महाराष्ट्र भाजप अध्यक्ष जालिंदर कामठे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष संचिन लंबाते, पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, संजय निगडे यांसह राख येथील ग्रामस्थ विठ्ठल पडळकर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत रणनवरे, रामा कोकरे, केरबा पडळकर, चेतन पवार, बाळासो पडकर, विजय रणनवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.