नागपूर : राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले आहे.मात्र अधिवेशनात केवळ मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर विरोधक जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावरूनच शिवसेनेने भाजपचा सामनामधून समाचार घेतला. तर या अग्रलेखाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चिमटा काढला आहे. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही कोविड, वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहीताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. पण आजच्या सामनाच्या अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला’ अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामनाच्या अग्रलेखावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.
‘वीज मुद्द्यावर सरकारने लबाडी केली, ज्या प्रकारे पहिल्या दिवशी अधिवेशनात आश्वासन दिले की वीज कापणार नाही आणि शेवटच्या दिवशी अगदी विसंगत स्टेटमेंट केले हे फक्त अधिवेशन काढायचे म्हणून केले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. ‘अर्थसंकल्पामध्ये आम्ही कोविड, वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहिताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. पण आजच्या अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला’, असा सणसणीत टोला फडणवीसांनी सेनेला लगावला.
अधिवेशनात काहीच फलित नाही. सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा केली. कोविड वाढतो आहे, सरकारचे लक्ष नाही, व्यवस्था नाही. अधिवेशन असते तेव्हा तो वाढतो, मग अधिवेशन सुरू नसते तेव्हा तो कमी असतो आणि मग संपले की, तो पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.