कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील ग्रीनपार्क हॉटेलसमोर भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरोज तानाजी पोवार (वय 20, रा. मोरेवाडी, ता. करवीर), शिवरंजक साताप्पा मरेन्नवार (वय 18 रा. निमशिरगाव, ता. हातकलंगले), आकाश तानाजी कदम (वय 20, जयसिंगपूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
हा अपघात दोन दुचाकी आणि व्हॅनच्या समोरासमोर धडकेत दुपारी एक वाजता घडला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सरोज पोवार, शिवरंजक मरेन्नवार आणि आकाश कदम कोल्हापूरहून दुचाकीवरून पन्हाळा दर्शनसाठी जात होते, तर उदय भानुदास मुळे (वय 43,रा.सांगली) हे पन्हाळ्यावरून व्हॅन घेऊन केर्ले गावाकडे येत होते.
नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हॉटेलच्या समोर व्हॅन आणि दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत सरोज आणि शिवरंजक यांचा जागीच मृत्यू झाला, तर आकाशवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.