श्रीगोंदा – अंधारात दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने तालुक्यातील काष्टी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौंड-पाटस रस्त्यावर घडली. ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्निल सतीष मनुचार्य (वय 24), गणेश बापू शिंदे (वय 25, तिघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) या तीन युवकांचा मृत्यू झाला.
मयत झालेले तीन तरुण रविवारी (दि.13) रात्री दुचाकीवर पुण्याहून काष्टीकडे येत होते. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौंड-पाटस रस्त्यावरील गिरीम फाट्याजवळ समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकले. यात ऋषिकेश मोरे व गणेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील मनुचार्य याला दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे तिन्ही तरुण तालुक्यातील काष्टी येथे एकमेकांच्या शेजारी राहत होते. या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली. आज (दि.14) सकाळी घोड नदीतिरी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.