नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या स्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी लष्कर तैनात करण्यात येणार आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शहराच्या विविध भागांमध्ये आणि उत्तर व दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत असे ते म्हणाले. राज्याच्या या तीन भागात चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
पश्चिम बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडून आलेल्या लेखी विनंतीला प्रतिसाद देत, “एनडीअरएफ’ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या आणखी 10 तुकड्या या राज्यात पाठवण्यात येणार आहेत. या तुकड्या आज रात्री उशिरापर्यंत कोलकात्याला पोहचण्याची शक्यता आहे.
सध्या पश्चिम बंगालच्या चक्रीवादळ-प्रभावित जिल्ह्यात, “एनडीआरएफ’ ची 26 पथके पुनर्वसन कार्यात व्यस्त आहेत. आणखी 10 पथके तैनात केल्यानंतर राज्यातील एकूण पथकांची संख्या 36 होईल. अम्फानमुळे प्रभावित सहा जिल्ह्यात ही पथके काम करतील.