मंचर – आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी (दि. 30) व बुधवारी (दि. 31 जुलै) या दोन दिवशी आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी अंदाजे तीन टन मटण आणि दिड टन मासे फस्त केले, अशी माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी दिली. दरम्यान, आषाढ साजरा करण्यासाठी नागरिकांनी रांगेत उभे राहून मटन, चिकन, माशांची खरेदी केली.
मंगळवारी, बुधवारी चिकन व मासळीचे भाव स्थिर होते. चिकनची विक्री 140 ते 150 रुपये दराने झाली. मटणाच्या बाजारभावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली होती. बाजारामध्ये मालाची आवक कमी असल्याने मटण व्यवसायिकांना 500 रुपये किलो दराने मटणाची विक्री करावी लागली. तसेच मासळी बाजारात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मासळी स्वच्छ करुन घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसांत आखाड पार्टी साजरी करण्यासाठी ग्राहकांनी पसंतीच्या नामांकित हॉटेलमध्ये गर्दी केल्याची माहिती कळंब येथील हॉटेल तिरंगा गार्डन परमिटरुम बिअरबारचे मालक नितीन भालेराव यांनी दिली. शेवटच्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी घरगुती कोंबडे, बकरे कापून देवासाठी नवसपूर्ती करण्यासाठी मोठी लगबग केली होती.