मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टीच्या भागात असलेल्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने 252 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
याबाबत राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, एनडीआरएफच्या निकषानुसार 72 कोटी रुपयांचा एकूण नुकसानीचा आकडा आला होता. त्यात राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीतून 180 कोटी रुपयांचे अधिकचे घालून मदत जाहीर केली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे नुकसानभरपाई दिली असती तर फक्त 72 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली असती, पण मुख्यमंत्र्यांनी तीन पट अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला. 252 कोटी रुपयांची मदत कोकणवासीयांना महाविकास आघाडीचे सरकार मार्फत देणार आहे.
यातील 30 कोटी 73 लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात येणार आहेत. पूर्वीच्या निकषापेक्षा तीन पट मदत सरकारने जाहीर केलेली आहे. या मदतीचे वाटपही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच गुजरातमध्ये चक्रीवादळ आल्यावर कुठलीही मागणी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजारो कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. मात्र, पंतप्रधानांनी राज्याचा दौराही केलेला नसून अद्याप मदतही जाहीर केलेली नाही. यामुळे पंतप्रधानांनी कोकणास भेट देऊन मदत जाहीर करावी, अशी आमची विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.