जामखेड -जामखेड शहरात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना वारंवार प्रशासन देत आहे. मात्र नागरिक ऐकत नसल्याने शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. प्रशासन करोनाची बाधा टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांना त्याचे भान नाही. जेव्हा जेव्हा बाजारपेठा सुरू होते, तेव्हा नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र असून, ते करोनाला आमंत्रण देत आहेत का काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
जामखेड शहर नुकतेच करोनामुक्त झाल्याने तहसील प्रशासनाने शनिवार वगळता आठवड्यातील दोन दिवस वेगवेगळी दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर बाजारपेठ सुरू झाल्याने सकाळपासून शहरात विविध सामान खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे. त्यामुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बॅंकांमध्ये देखील अशीच गर्दी दिसत होती. पण अजूनही नागरिकांच्या वागण्यात काहीही फरक होताना दिसत नसून, बाजारपेठ सुरू झाल्यानंतर पुन्हा गर्दी पहावयास मिळाली.
मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी शहरातील काही दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यात दुकानांसमोर प्रत्येकी तीन फुटांवर चौकोन आखून दिले होते. त्यातच ग्राहकांनी उभे राहावे, असे आवाहन दुकानदार करत होते. मात्र नागरिक ऐकत नव्हते. लॉकडाऊन काळात तुरळक प्रमाणात दिसणारी वाहनेही मोठ्या संख्येने आल्याने काही वेळ मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली होती. ही वाढती गर्दी प्रशासनासाठी त्रासदायक ठरू लागली आहे.
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
प्रशासनाकडून शहरात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या सवलती देण्यात आल्या आहेत, त्या नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत. मात्र, अनेक नागरिक याचा गैरफायदा घेऊन विनाकारण गर्दी करत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेने कारवाईसाठी पथके नियुक्त केली आहेत. मात्र, त्यांचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.