सातारा – जावळी तालुक्यातील करोनाबाधित रुग्णाचा आज शुक्रवारी सकाळी म्रुत्यू झाला आहे. तर एका २ महिन्यांच्या बाळासह दोन महिलांचाही म्रुत्यू झाला आहे. करोना संशयित म्हणून या तिघांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आज चौघांचा म्रुत्यू झाला आहे.
जावळी तालुक्यातील एका ५८ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेचा तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मुंबईतील वरळी येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील ६४ वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्रदयविकाराने मृत्यु झाला असून करोना संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिली.
मुंबईतील घाटकोपर येथून प्रवास करुन आलेल्या २ महिन्यांच्याच बाळाला श्वास घेण्यात त्रास होता. त्याला कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. या २ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच नांदलापूर (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला कृष्णा मेडिकल काँलेजमध्ये संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
१४६ जण निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ३४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ५३, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील ९, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १५ अशा एकूण १११ जणांचे तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ३५ जणांचे असे एकूण १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
१०९ जण विलगीकरण कक्षात दाखल
दि. २१ रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २२, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ८७ अशा एकूण १०९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली आहे. यापैकी ९० जण उपचार घेत आहेत. १०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.