जयपुर- एकाच कुटुंबात लग्न करून आलेल्या तीन सख्या बहिणींनी आपल्या दोन लहानग्या मुलांची हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार जयपुर जिल्ह्यात घडला आहे. विशेष म्हणजे या तीन बहिणींपैकी दोन बहिणी गर्भवती होत्या.
हुंड्यासाठी सासरचे लोक त्रास देत असल्याच्या कारणावरून तसेच नवऱ्यांकडून दारू पिऊन सतत होत असलेल्या मारहाणीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन मृत मुलांपैकी एकाचे वय चार वर्षांचे आहे तर दुसऱ्याचे केवळ 27 दिवसांचे आहे.
काली देवी (वय 27), ममता वीणा (वय 23) आणि कमलेश मीणा (वय 20) अशी या तीन सख्या बहिणींची नावे आहेत. आम्ही सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत असे मोबाईल स्टेट्स एका बहिणीने ठेवले होते.
त्यातून या प्रकाराचा उलगडा झाला. रोज मरण्यापेक्षा आम्ही तिघी एकत्रच मरण पत्करत आहोत. याला आमचे सासरचे लोक जबाबदार आहेत. आमच्या आई वडिलांचा यात काहीच दोष नाही. पुढच्या जन्मी आम्ही तिघी बहीणी पुन्हा एकाच घरात जन्माला येऊ असेही त्यांनी आपल्या स्टेटस मध्ये नमूद केले होते.
आपल्या घरा जवळील विहीरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. यापैकी एक बहीण येत्या गुरूवारीच प्रसृत होणार होती असे त्यांच्या डॉक्टरांचा अहवाल सांगतो. या तिन्ही बहीणी हुशार होत्या. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेवले होते. त्यांचे पती मात्र अल्पशिक्षीत होते. ते दारू पिऊन तिन्ही बहिणींना मारहाण करीत असत. त्यामुळे हा त्रास असह्य झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, आमच्या पाच जणांच्या मृत्यूला आमचे आसरचे लोक कारणीभूत आहेत. आम्ही हे टोकाचे पाऊल उचलण्यास तयार नव्हतो. मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मृत्यूला कवटाळणे बरे वाटले. या घटने आमच्या आई-वडिलांचा काहीही दोष नाही, असे त्यांनी सुसाईडनोटमध्ये लिहिले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.