श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन तरुणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मौजे वेळास आदगाव येथील वेळास आगर बिचवर घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
म्हसळा तालुका हिंदू समाज उपाध्यक्ष, आर.डी.सी. बँक म्हसळा शाखा संचालक, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील (रा. गोंडघर) यांची दोन मुले, अवधूत पाटील (वय-२६) आणि मयुरेश पाटील (वय-२३) आणि त्यांचा मित्र हिमांशू पाटील (वय-२१, रा. ऐरोली, नवी मुंबई) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिघेजण गोंडघर गावापासून जवळच असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी फिरायला गेले होते. समुद्रकिनारी क्रिकेट खेळताना चेंडू घेण्याच्या प्रयत्नात ते समुद्राच्या खोल भागात गेले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच वेळास गावातील तरुण, दिवेआगरचे सरपंच, उपसरपंच यांनी तत्काळ चार ते पाच जेटस्की बोटी घटनास्थळी पाठवल्या. वेगाने हालचाल करत वेळास आदगाव येथील स्थानिक तरुण आणि दिघी सागरी पोलीस यांनी तिघांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
संतोष पाटील यांच्या परिवाराने दोन दिवसांपूर्वी नवीनच चार चाकी गाडी खरेदी केली होती. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी अवधूत पाटील आणि मयुरेश पाटील हे मित्रांसोबत वेळास समुद्रकिनारी गेले होते. पाटील कुटुंबाच्या नवीन गाडी घेतल्याच्या आनंदावर काही वेळातच विरजण पडले.