नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षाच्या तीन नव्या समित्या स्थापन केल्या. त्या समित्या अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करून सोनियांना सल्ला देतील.
सोनियांनी स्थापन केलेल्या तिन्ही समित्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. त्यातून पक्ष नेतृत्वाकडून मनमोहन यांना देण्यात येणारे महत्व अधोरेखित झाले आहे. अर्थव्यवस्था विषयक समितीच्या सदस्यांमध्ये पी.चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.
त्या समितीचे संयोजक म्हणून जयराम रमेश काम पाहतील. परराष्ट्र व्यवहार विषयक समितीमध्ये आनंद शर्मा, शशी थरूर आणि सप्तगिरी उल्का यांना स्थान मिळाले आहे. सलमान खुर्शिद त्या समितीचे संयोजक असतील. राष्ट्रीय सुरक्षा विषयक समितीच्या सदस्यपदी गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, व्ही.वैथिलिंगम यांची वर्णी लागली आहे. विन्सेंट पॉल यांना त्या समितीचे संयोजक बनवण्यात आले आहे.
असंतुष्टांना सामावून घेत साधला समतोल
समित्यांमध्ये चार असंतुष्ट नेत्यांना सामावून घेत सोनियांनी समतोल साधल्याचे मानले जात आहे. काही महिन्यापूंर्वी कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनियांना एक पत्र पाठवले. त्या पत्रातून पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल करण्याची मागणी करण्यात आली.
त्या पत्रामुळे कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पत्रप्रपंच करणाऱ्या नेत्यांचा उल्लेख सातत्याने असंतुष्ट म्हणून केला जात आहे. त्या नेत्यांमध्ये समावेश असणाऱ्या आझाद, शर्मा, मोईली आणि थरूर यांनाही नव्या समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे.