श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी धडक मोहिमांचे सत्र सुरू ठेवत शनिवारी आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती घटना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात घडली.
दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी संबंधित ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले. ते लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे समजते.
मागील पंधरवड्यापासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमांची तीव्रता वाढवली आहे. त्यामध्ये लक्षणीय संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांचे ते यश दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडणारे ठरत आहे.