लखनौ – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी शनिवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे त्या प्रकरणात आतापर्यंत गजाआड झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहचली आहे.
लखीमपूर खेरीत 3 ऑक्टोबर या दिवशी एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषचे असल्याची माहिती समोर आली. त्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी त्या प्रकरणी कारवाईचे पाऊल उचलताना आरोपींच्या अटकेचे सत्र सुरू केले आहे.
याआधी गजाआड झालेल्यांत मंत्रिपुत्र आशिषचाही समावेश आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. हिंसाचार प्रकरणावरून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्या मागणीची तीव्रता वाढवण्यासाठी शेतकरी संघटना 26 ऑक्टोबरला देशव्यापी निदर्शने करणार आहेत.