फुलबाजार आडते, व्यापारी संघटनेची बाजार समितीकडे मागणी
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचा फूलबाजार तब्बल तीन महिने बंद होता. या काळात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गाळ्यांचे मासिक भाडे आणि वीजबिल माफ करावे, अशी मागणी फूलबाजार आडते आणि व्यापारी संघटनेने बाजार समितीकडे केली आहे.
बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी याबाबत निवेदन दिले आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दि. 19 मार्चपासून फूलबाजार बंद झाला. तो दि. 18 जूनपासून सुरू करण्यात आला. या कालावधीत शेतकऱ्यांनी फूलशेती काढून टाकली. तर, व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. फूलबाजारातील गाळ्यांना मासिक भाडे आकारले जाते. तर, वीजबिलही बाजार समितीकडे जमा करावे लागते. ते माफ करावे, अशी मागणी केल्याचे गायकवाड म्हणाले.