सामाजिक न्यायसाठी तातडीने 1 हजार 273 कोटींचा निधि वितरित
मुंबई : करोनामुळे राज्याचे उत्पन्न ठप्प झाले असतानाही वंचित घटकांना फटका बसू नये, त्यांना आधार मिळावा यासाठी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या अनुदानाची तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम सामाजिक न्याय विभागाला आज आगाऊ देण्यात आली. येत्या काही दिवसात ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ (ऍडव्हान्स) निधी आज तातडीने वितरित करण्यात आला. करोनामुळे समाजातील उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविण्यात येतात.
या योजनांसाठी अर्थसंकल्पात 2723 कोटी 49 लाखांची तरतूद केली होती. मात्र, करोनामुळे परिस्थिती बदलली आहे. करोनामुळे राज्याचे उत्पन्न ठप्प झाले असतानाही वंचित घटकांना फटका बसू नये, त्यांना आधार मिळावा यासाठी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या अनुदानाची तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम सामाजिक न्याय विभागाला आज आगाऊ देण्यात आली.
केंद्र शासनाकडून अवघे 130 कोटी प्राप्त झाले असताना राज्य शासनाने स्वत:च्या तिजोरीतून ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे सुरू संचारबंदीच्या काळात नागरिकांना बाहेर पडावं लागू नये यासाठी एप्रिल, मे व जून य तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच जमा होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.