सातारा – पुणे, मुंबई आदी ठिकाणांवरून गेल्या दीड महिन्यात 6 मेअखेर तीन लाख चार हजार 207 मूळचे सातारकर सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. बाहेरून येणारी संख्या आणखी दीड लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरून येणाऱ्या वाढत्या संख्येच्या ताणाने प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 46 दिवसांपासून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. सातारा जिल्हयात तब्बल 115 रुग्ण करोनाबाधित असून या रुग्णांची संख्या कराड तालुक्यात सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासनाने करोना प्रतिबंधाच्या सुसुत्रीकरणासाठी विविध तालुक्यांत पोलीस पाटलाच्या माध्यमातून मूळचे सातारकर पण पुणे, मुंबई येथून येणाऱ्यांची नोंद ठेवली. तर 23 मार्च ते 6 मे या 45 दिवसांत तब्बल तीन लाख चार हजार 307 नागरिक जिल्हयातील आपल्या मूळ गावी आले.
पाटण व जावळी तालुक्यातील युवा वर्ग माथाडी कामगार म्हणून मुंबई व ठाणे परिसरात वास्तव्य करून असतो. याच दोन तालुक्यांत मूळ निवासी सर्वाधिक संख्येने परतले आहेत. जावळी तालुक्यात 47003 तर पाटण तालुक्यात 39567 व त्याखालोखाल सातारा तालुक्यात 30990 असे नागरिक आले आहेत. कोरेगाव तालुक्यात 26797, कराड तालुक्यात 19134, खंडाळा तालुक्यात 19115, खटाव तालुक्यात 23869, महाबळेश्वर तालुक्यात 18160, फलटण तालुक्यात 29882 आणि माण तालुक्यात 23375 नागरिक आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या वाढल्याचे या आकडेवारीने स्पष्ट होत आहे.
प्रशासनापुढे मोठे आव्हान
निझरे गावातील करोनाबाधित उपचार घेऊन यशस्वी घरी परतले. जावळी तालुका मोठया महत्प्रयासाने करोनामुक्त झाला. मात्र, जावळी व पाटण तालुक्यात पुणे, मुंबई येथून आलेल्यांचा आकडा सर्वाधिक आहे. प्रवास किंवा स्तलांतरामुळे करोनाचा प्रसार होतो. कराड तालुक्यातील रुग्ण तसेच सोनके, पुण्यावरून कारागृहातून आणलेले कैद्यांपैकी काही कैद्यांना करोनाची बाधा झाली, ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या तीन लाख लोकसंख्येच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. नोंदणीकृत आणखी दीड लाख सातारकर साताऱ्यात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही संख्या लक्षात घेतली तर जिल्हा प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे.