संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सय्यद शौकत सय्यद (वय 20, रा. हसनापूर, ता. राहाता), सुनील अंकुश खरात (वय 25, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे), किरण शिवाजी शिंदे (वय 25, रा. डिंबे, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकी उलटून रस्त्याच्या कडेला 100 फूट अंतरावर पडली. हा अपघात इतका भयानक होता की दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे महामार्गावर रक्ताताचा सडा पडला होता. काही वेळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
घारगाव पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली व ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरातील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी करत आहेत.