संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ वाळू तस्करी करणारा पिकअप कॅनॉलच्या खड्ड्यामध्ये उलटला. या अपघातात पिकअपमधील तीन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज पहाटे घडली. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथेही महसूलाच्या पथकाने एका ट्रॅक्टरवर कारवाई केली असून, वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे.
परवेज भैयासाब सय्यद (रा. संगमनेर खु.), विठ्ठल मारुती बर्डे (रा. कोंची, ता. संगमनेर) व सुरेश संतोष माळी (रा. मांची, ता. संगमनेर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तसेच जखमीचे नाव समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून पहाटेच्या वेळी वरील चौघे पिकअकमध्ये (क्र. एमएच- 14 एएच- 1073) अवैध वाळू भरून निघाले होते. ते निमगाव मार्गे जात असताना हिवरगाव पावसा खंडोबा मंदिरा जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन कॅनॉलच्या खड्ड्यात उलटला. त्यात सय्यद, बर्डे, माळी यांचा मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी झाला. सकाळी ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी सदर घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमीस उपचारासाठी दाखल केले. तसेच तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील सहायक फौजदार इस्माईल शेख, प्रभाकर तोरकडी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, धांदरफळ खु. येथेही प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका ट्रॅक्टरला वाळूसह ताब्यात घेतले आहे.
पाठलाग होत असल्याने अपघात झाल्याची चर्चा
एक अधिकारी या वाळूच्या वाहनाचा पाठलाग करत असताना हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकारी तालुक्याबाहेरील असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे बाहेरचे काही अधिकारी तालुक्यात येऊन वसुली करीत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.