नवी दिल्ली – पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्येक लॉंच पॅडवर सुमारे अडीचशे ते तीनशे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यासाठी पाकिस्तान 2003 च्या शस्त्रसंधी कराराचे वारंवार उल्लंघन करत आहे. त्यासाठी करत असलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात भारतीय नागरिकांच्या मालमत्तांचे आणि जीवीताचे नुकसान होत आहे, असा आरोप सीमा सुरक्षा दलाने रविवारी केला.
बारमुला, कुपवाडा आणि बंदिपोरा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केला. त्यात शहीद झालेल्या जवानांना रविवारी भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या वतीने श्रधंजली वाहण्यात आली. उरी, नौगाम केरन आणि गुरेझ क्षेत्रात केलेल्या गोळीबारात महिला आणि लहान मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याला भारताने जोरदार प्रत्यूत्तर दिले होते.
किस्तानच्या या माऱ्यात भुषण रमेशराव सताई (वय 28) आणि हृषीकेश रामचंद्र जोंधळे या दोन सुपुत्रांना वीरमरण आले. कोणतेही कारण नसताना पाकिस्तान कुरापत काढत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला प्रत्यूत्तर द्यावे लागते. शहीद उपनिरीक्षक राकेश दोभाल यांच्यासह आम्हाला काही जीवीत हानी सोसायला लागली, असे ते सीमासुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी सांगितले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने दहशतवादी घुसवण्यासाठी बांधलेल्या प्रत्येक तळावर 250 ते 300 दहशतवादी भारतात येण्याच्या तयारीत आहेत. त्यांना येथील सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य बनवायचे आहे. मात्र हा धोका टाळण्यात सीमा सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत, असेही मिश्रा यांनी सांगितले.