लखनऊ : लग्नात अनेक गंमती जमती घडत असतात. रुसवे फुगेवही होत असतात. पण लखनऊमध्ये एका लग्नात भलतीच गोष्ट घडली आहे. संभळ येथे एका तरुणीशी निकाह करण्यासाठी एकदोन नव्हे तर चक्क तीन तरुणांनी दावा केला. त्यासाठी या तरुणांनी विवाह मंडपात गोंधळही घातला. त्यामुळे या अजब लग्नाची सध्या संभळमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
संभळच्या हयात नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सराय तरीन मोहल्ल्यात एका तरुणीच्या निकाहाची तयारी सुरू होती. त्याचवेळी परिसरातील एक तरुण या तरुणीच्या घरी पोहोचला आणि त्याने हा निकाह थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने गोंधळही घातला. या तरुणीसोबत आपला एक वर्षापूर्वीच निकाह झाल्याचा दावा या तरुणाने केला. या तरुणीचे आईवडील दमदाटी करून या मुलीचा जबरदस्तीने दुसरीकडे निकाह लावून देत आहेत, असं त्याचं म्हणणं होतं. त्याने उपस्थितांना त्यांचा निकाहनामाही दाखवला.
हा गोंधळ सुरू असताना दुसरा तरुण नवदेव बनून वरातीसह या तरुणीच्या घरी पोहोचला. या तरुणीशी आपलं लग्न ठरलं असून त्यामुळेच मी निकाह करण्यासाठी पोहोचलो आहे, असं त्याने सांगितलं. त्यामुळे दोन्ही तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा गोंधळ सुरू असतानाच आणखी एक तिसरा तरुण या तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने ही तरुणी आपली प्रेयसी असल्याचं सांगत तिच्याशी निकाह करण्याचा दावा केला.
एकाच वेळी तीन तरुणांनी या तरुणीशी निकाह करण्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी प्रचंड गोंधळही घातला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. मात्र, संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर पोलीसही कोणतीही कारवाई न करता निघून गेले. पोलीस गेल्यानंतर पंचायत बसली. यावेळी या तरुणीचं म्हणणं जाऊन घेतलं. तेव्हा तिने एकाशीच निकाह करणार असल्याचं सांगून बाकीचे दोन तरूण विनाकारण त्रास देत असल्याचं सांगितलं.
तरुणीच्या सहमतीनंतर पंचायतने महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या तरुणाने एक वर्षापूर्वी तरुणीशी निकाह झाल्याचं सांगितलं होतं, त्याला निकाहासाठी आलेला खर्च देऊन त्याची बोळवण करण्यात आली. तर प्रियकर असल्याचा दावा करणारा तरुण तरुणीच्या जातीचा नसल्याचं कारण देऊन त्याच्याशी निकाह लावून देण्यास पंचायतने नकार दिला. त्यानंतर तिसऱ्या युवकाशी या तरुणीचा निकाह लावून देण्यात आला.