वाई – वाई तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोन युवक धोम डाव्या कालव्यात वाहून गेल्याची फिर्याद दि. 4 रोजी नातेवाईकांनी वाई पोलीस ठाण्यात दिली होती. वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. 4 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास विकास रामचंद्र पाटील (वय 22, सध्या रा. हॉटेल अभिजित एमआयडीसी, वाई, मुळ रा. कोलवड, ता. यावल जि. जळगाव) हा आपल्या तीन मित्रांसोबत पेटकर वस्ती, मोतीबाग, वाई येथे पोहोण्यासाठी गेला होता.
पोहायला येत नसल्याने विकासने पाण्यात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला. विकास पाटील यांचा मृतदेह बुधवारी सकाळी मोतीबागपासून तीनशे मीटरवर आढळून आला. दुसऱ्या घटनेमध्ये चिखली, ता. वाई येथील ऋतिक विनायक सोनावले (वय 19) हा नातेवाईकांबरोबर दुपारी साडेबाराच्या सूमारास धोम डाव्या कालव्यावर व्याहळी कॉलनी येथे वाकळा धुण्यासाठी गेला होता.
पाय घसरून पडल्याने पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला व बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सापडला. तर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोतीबाग येथे हौदाची पट्टी नावाच्या शिवारात अंदाजे 45 वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची फिर्याद सचिन अशोक धागे (वय 43) रविवार पेठ वाई यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.