पुणे – शेतकरी सन्मान योजनेत सहभागी होण्याकरिता आधार कार्ड लिंक करण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत. या कालावधीत आधारकार्ड लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली होती. त्यात 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये मदत दिली जाणार होती. राज्यांनी या योजनेच्या लाभार्थींची जी नावे पाठवली ती आणि ज्या खात्यांवर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली त्यात तफावत असल्याचे उघड झाले. 2,69,605 लाभार्थी प्रकरणात ही तफावत होती. नंतर जमा करण्यात येत असलेले पैसे रोखण्याचे आदेश निघाले; पण तोपर्यंत 1,19,743 जणांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते, नंतर हे पैसे माघारी घेण्याची वेळ आली. यात सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रकरणांची आहे.
मात्र, आता देशभरातील अनेक शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड या योजनेला लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा केली जात नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. आता या योजनेला आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत असून त्याकरिता अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत.