नवी दिल्ली -ममता बॅनर्जी, के.चंद्रशेखर राव आणि अमरिंदर सिंग हे भाजपेतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री शनिवारी येथे झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर प्रकृतीच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यामुळे बैठकीत पंजाबचे प्रतिनिधित्व अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी केले. तेलंगणमधील एका महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या तयारीत व्यस्त असल्याने मुख्यमंत्री राव बैठकीसाठी देशाच्या राजधानीत दाखल झाले नाही. बैठकीसाठी तेलंगण सरकारने कुठला प्रतिनिधी पाठवला नसल्याचे समजते.
तर मोदी सरकारशी संघर्ष करण्याच्या मुडमध्ये असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. तसे पत्रही त्यांनी मोदींना पाठवले होते. निती आयोगाला कुठलेही आर्थिक अधिकार नाहीत.
त्यामुळे बैठकीला उपस्थित राहणे निष्फळ ठरेल, अशी भूमिका ममतांनी मांडली होती. त्या तिघांव्यतिरिक्त इतर सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थिती लावली.