मुंबई : राज्यातील 288 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. किरकोळ घटना वगळता राजयात शांततेत मतदान झाले. मतदानानंतर आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. दरम्यान, पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निकालाला अजून तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडून विजयी मिरवणूका काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विजयाची घाई झालेल्या उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष केला. पुण्यातील शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी मतदान झाल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी शिरोळे विजयी होणार असल्याचा दावा करत गोखले नगरमध्ये फटाके फोडले.
दुसरीकडे कागलमध्येही विजयाआधी फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनीही मतदान संपल्यानंतर विजयी मिरवणूक काढली. यावेळी गुलाल उधळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
दापोलीतून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनीही विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. मात्र, या उमेदवारांनी निकालाआधीच फटाके फोडून गुलाल उधळल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.