जम्मू – पाकिस्तानने पुन्हा आगळीक करत सोमवारी भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी आणि दोन नागरिक मिळून तिघे जखमी झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला. त्यांच्या माऱ्याचे लक्ष्य भारतीय सीमा ठाण्यांबरोबरच निवासी भागही ठरले. पाकिस्तानी माऱ्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे समजते. पाकिस्तानी माऱ्यामुळे एलओसी लगतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्या माऱ्यामुळे जंगलाला आग लागली. मागील दीड महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी तब्बल 513 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी केलेल्या माऱ्यात सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीत 10 जण मृत्युमुखी पडले, तर 50 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये 4 शहीद जवानांचा समावेश आहे. पाकिस्तानी माऱ्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात पाकिस्तानी बाजूची 5 ते 6 पट अधिक हानी झाल्याचे समजते.