भंडारा – भंडारा जिल्ह्यातील मेश्राम कुटुंबियावर दिवाळीच्या दिवशीच आभाळ कोसळले आहे. परंपरेनुसार शेळ्या-मेंढ्यांना तलावावर आंघोळीसाठी घेऊन गेले असताना तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडली आहे.
मधुकर मेश्राम (45), सुधाकर मेश्राम (43) आणि प्रदीप मेश्राम (39) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीत शेळ्यामेंढ्यांना आंघोळ घालण्याची परंपरा असल्यामुळे हे तिघे भाऊ तलावावर गेले होते. तब्बल 100 शेळ्या-मेंढ्या त्यांच्याकडे होत्या. मोठा भाऊ मधुकर हा पहिला पाण्यात जाऊन आंघोळ घालू लागला.
मात्र शेळ्या-मेंढ्या बाहेर काढत असताना मधुकर पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी सुधाकरदेखील पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तेही बुडू लागले. अखेर प्रदीपदेखील पाण्यात उतरले असता तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
यावेळी मधुकर मेश्राम यांचा 13 वर्षीय मुलगा तुषार देखील उपस्थित होता. त्याने ही घटना घडत असताना मोबाईलवरून कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईक यांनी तलावाजवळ धाव घेतली. तिघांचेही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चहांदे, पोलीस नाइक दुर्योधन वकेकार, पोलीस अंमलदार संदीप रोकडे यांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे संबंध पुयार गावावर शोककळा पसरली आहे.