बरेली – उत्तर प्रदेशातील एका गावातील किछा नदीच्या पात्रात आज पुन्हा तीन मृतदेह आढळून आले आहेत. त्यांची ओळख पडली असून हे तिन्ही तरुण मुलांचे मृतदेह आहेत.
जैनुल वय 17, सय्यद औसाफ वय 18 आणि जमीन अली वय 17 अशी या तीन मृतांची नावे आहेत. या संबंधात माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सकृतदर्शनी हे तिन्ही युवक पाण्यात वाहून गेल्याने मरण पावले असावेत असा कयास आहे.
त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण लक्षात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या घरच्यांकडे चौकशी केली असता मंगळवारी हे तिघेही जण मोटारसायकलवरून घराच्या बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरीच परतले नव्हते. आता थेट त्यांचे मृतदेहच आढळून आले आहेत. आज सकाळी सिमरा गावाजवळ नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.