पुणे : दुचाकी भाडेतत्वावर घेऊन तीची परस्पर विक्री करणार्या दुचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय असलेल्या एकासह तिघा जणांच्या टोळीला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अरीश रेमंड धवर (31, रा. लक्ष्मी रेसीडेन्सी, पठारे वस्ती, लोहगांव मुळ रा. ताडदेव, मुंबई), अंबरेश शांतनूर बिदनूर (33, पठारे वस्ती, लोहगांव, मुळ रा. कर्नाटक) आणि नरेंद पुरूड (37, रा. नानापेठ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र पुरूड हा नानापेठ जवळील रास्तापेठ येथे नरेंद्र मोटर्स नावाने दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान चालवतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील श्राईड इंडीया प्रायव्हेट लिमिटेड येथील दुकानातून भाडेतत्वावर इलेक्ट्रॉनिक दुचाकी देण्यात येतात. 16 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत त्या दुकानातून तीन दुचाकी मालकाने आठ दिवसांसाठी नानापेठ येथे भाडेतत्वावर दिल्या होत्या. परंतु, मुदत संपल्यानंतरही दुचाकी परत आल्या नाही. त्यामुळे दुकान मालकाने संबंधीत व्यक्तीकडे फोनवर संपर्क केला असता, त्याने दुचाकी देण्यास टाळाटाळ करत उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांचे फोनच बंद आले. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी तक्रारदारांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तीनही इलेक्ट्रीक दुचाकी नानापेठ परिसरात असल्याची माहिती पोलिस हवालदार रणजित उबाळे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून तिनही आरोपींना जेरबंद करण्यात आले. तिघांनाही दुचाकीला जीपीएस सिस्टीम आहे याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे ते बिनधास्तपणे दुचाकीचा व्यवहार करत होते.
पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे, सतिश भालेराव, अमंलदार संतोष काळे, सुशील लोणकर, निलेश साबळे, महेश जाधव यांनी कारवाई केली.