नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. तसा दावा दिवाकर यांनी केला असून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काशिफ अहमद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली असून हा व्यक्ती इस्लामिक आगाझ चळवळीशी संंबंधित आहे. न्यायाधीश दिवाकर यांना पत्राद्वारे धमकी मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मंगळवारी गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि वाराणसी पोलीस आयुक्तांना दिली आहे.
हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण ही सामान्य प्रक्रिया वक्तव्य तुम्ही केले आहे. तुम्ही मूर्तीपूजक आहात. तुम्ही मशिदीला मंदीर म्हणून घोषित कराल. मुर्तिपूजक, काफिर आणि हिंदू न्यायाधिशाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही,” असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.
वारणसीचे पोलीस सतिश गणेश यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून वारणसीचे पोलीस उपायुक्त याबाबत तपास करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच न्यायाधीशांना आगवीची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, असेदेखील सतिश गणेश यांनी सांगितले आहे. न्यायाधीश दिवेकर यांच्या सुरक्षेसाठी ९ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, न्यायाधीश दिवेकर यांना धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. “या दिवाणी खटल्याला एका विशेष खटल्याचे रुप देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बिघडलेल्या वातावरणामुळे माझे कुटुंबीय माझ्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. तसेच मलादेखील त्यांच्या सुरक्षेची चिंता लागली आहे,” अशी प्रतिक्रिया दिवाकर यांनी दिली आहे.