– ममता बॅनर्जी यांचा केंद्रीय संस्थांवर आरोप
कोलकाता- भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हावे यासाठी केंद्रीय यंत्रणेकडून तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना धमकावले जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपमध्ये सामील न झाल्यास चिटफंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या तृणमूलच्या नेत्यांना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहिद दिनाच्या निमित्ताने आयोजित रॅलीमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपकडून तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना पैशाचे अमिष दाखवले जात असल्याचाही आरोप केला.
लोकसभेनंतरच्या पहिल्याच मोठ्या राजकीय रॅलीमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपचा काळापैसा परत आणण्याच्या मागणीसाठी 26 जुलैरोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणाही केली.
भाजपकडून तृणमूलच्या आमदारांना 2 कोटी रुपये आणि पेट्रोल पंप देण्याचे आमिष दाखवले जात आहे. कर्नाटकप्रमाणे भाजप घोडेबाजार अरत आहे. तेच मॉडेल इथेही वापरले जात आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला.
भाजप देशाची संघराज्य रचनाच नष्ट करू पहात आहे. भाजप सरकार विचित्रप्रकारे वागत आहे. हे सरकार दोन वर्षेही टिकणार नाही. कोणतीही चर्चा किंवा पूर्वसूचनेशिवाय भाजप विधेयके आणत आहे आणि मंजूरही करून घेत आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्याचे श्रेय विरोधकांनाच जाते आहे. सरकारला नाही, असेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता असताना 1993 साली 21 जुलै रोजी युथ कॉंग्रेसच्या 13 कार्यकर्ते पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले होते. त्याप्रसंगी ममता बॅनर्जी युथ कॉंग्रेसच्या नेत्य होत्या. तेंव्हापासून दरवर्षी 21 जुलै रोजी तृणमूल कॉंग्रेसच्यावतीने शहिद दिवस पाळण्यात येतो.