मुंबई – चेंबूर येथील व्यावसायिक ललित टेकचंदानी यांनी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. यासंदर्भात टेकचंदानी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून भुजबळ आणि अन्य दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
भुजबळ म्हणाले, 1995 ते 2014 त्यानंतर 2019 पर्यंत टेकचंदानी यांनी आमच्यावर विविध केसेस केल्या आहेत. यातील काही केसेस सुटल्या आहेत तर काही केसेस अद्यापही सुरु आहेत. मात्र तेव्हापासून या टेकचंदानीचे नाव पत्ता सोडून दिला होता. नंबर डिलीट केला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असल्याचे कारण नाही. दरम्यानच्या काळात सरस्वती प्रकरण आल्यापासून अनेक मॅसेज यायला सुरवात झाली. कुणी अनोळखी माणूस सातत्याने मॅसेज करत असल्याचे समजले. त्यामुळे हा माणूस कोण आहे? हा का सतत त्रास देत आहे. याबाबत विचार करत होतो. शेवटी सहकाऱ्याला सांगून याबाबत माहिती काढायला लावली.
सहकाऱ्याने त्याला कॉल केला, मात्र समोरून उचलला गेला नाही. ही गोष्ट पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीला माहिती झाल्यानंतर तिने संपर्क केला. त्यावेळी टेकचंदानीने ‘मला बोलायचा अधिकार असून मी बोलू शकतो म्हंटलं. त्यावर भुजबळांना त्रास का देत आहेत? अशी विचारणा केली. शेवटी त्याला आम्ही म्हणालो कि, आम्ही भेटायला येतो… पण ते झाले नाही. या व्यतिरिक्त काहीही झालेले नाही. कोणीही धमकीचे मॅसेज अथवा कॉल केलेले नाहीत. टेकचंदानी यांचे आरोप चुकीचे असल्याचे भुजबळांनी सांगितले. नाव खराब करण्याच्या हेतून हे कुभांड रचले असल्याचेही माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी सांगितले.