कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने कोल्हापूरातील ऊस तोड कामगारांची अवस्था आता दयनीय झाली आहे. आम्हाला आमच्या गावाला सोडा अन्यथा आम्ही सर्व ऊस तोड कामगार आत्महत्या करतो, असा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरातील साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम नुकताच 31 मार्चला संपला आहे. त्यातच आता हजारो ऊस तोड कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर करण्याच्या ऊस तोड कामगारांनी जीवन मरणाचा प्रश्न उपस्थितीत केला.
आमच्या जनावरांना चारा नाही, माणसांना खायला अन्न नाही. आमची मुलं बाळ गावाकडे रडत आहेत. केवळ सव्वा दोन एकरात आम्ही साडेपाच हजार लोक राहतो. आम्हाला येथे करोना झाला तर आमची पिढी बरबाद होईल. शासन सोशल डिस्टनिंगचा नियम पाळा, अशी सूचना करत आहे. पण आमच्या येथे हे सोशल डिस्टनिंग आहे का? याची शासनाने खातरजमा करावी. याठिकाणी तुम्ही आम्हाला सोन्याचा घास दिला तरी तो नको, आम्हाला येथे थांबायचं नाही. काहीही करून गावाकडे पाठवा. अन्यथा मुलाबाळांसह सर्वजण कृष्णा, पंचगंगा नदीत आत्महत्या करू, असा इशारा बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांनी दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्य आणि जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असल्याने कोणालाही बाहेर जाता येणार नाही. परंतु ज्या ज्या साखर कारखान्याकडे ऊस तोडणी कामगार आहेत. त्या कारखानदारांनी त्यांची जेवणाबरोबर आरोग्य आणि राहण्याची व्यवस्था करावी, असा आदेश दिला आहे. परंतु या आदेशाला कारखानदारांनी बगल दिली असून ऊस तोडणी मजुरांनी येथे राहायचे नाही. असा हट्ट सुरू केल्याने आम्ही काहीही करू शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. पर्यास्त ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न अधांतरी राहिला आहे.
विशेष म्हणजे कारखाना परिसरातील सव्वा दोन एकर जागेवर तब्बल 1 हजार 400 हून अधिक ऊस तोडणी कामगार कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. याठिकाणी सुमारे साडेपाच हजार हून अधिक मजूर राहतात. यापैकी एका जरी मजुराला करोनाची लागण झाली तर संपूर्ण शिरोळ शहराचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना साखर कारखाने कसे सुरू राहिले. याची चौकशी व्हावी. त्याचबरोबर इतर उद्योगांना व कामगारांना लॉक डाऊनची नियमावली लागू केली मात्र ऊस तोडणी कामगारांना लागू केले नाही का ? असा सवाल ऊस तोडणी कामगारांनी केला. तुम्ही आम्हाला सोन्याचा घास दिला तरी खाणार नाही आमची लेकर गावाकडे अन्नासाठी तडफडत आहेत. या काळात त्यांचे काही बरं वाईट झालं तर शासन जबाबदारी घेणार आहे का ? आम्हाला तुम्ही इथून बाहेर काढा आमच्या गावात आम्ही डोंगरावर किंवा गावाबाहेर जाऊन राहू पण इथे राहणार नाही.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला गावाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करावी व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी ऊस तोडणी मजुरांना गावी जाण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला आत्मदहन करावे लागेल, असा इशारा बीड जिल्ह्यातील बोरपडी, कारे, सोनपेठ या गावातील ऊस तोडणी मजूर रावसाहेब घुगे, लाला तोंडे, उत्तरेश्वर खंदारे, राणी खंडारे, देवशीला घुगे यांनी दिला आहे. यावेळी लक्ष्मण खंदारे, चंद्रकांत खंदारे, बापू खंदारे, राजाभाऊ खंदारे, मंदाकिनी खंदारे, आशाबाई घुगे, राधा खंदारे यांच्याबरोबर ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.