नवी दिल्ली : दिल्लीत आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी भारतीय शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नोएडा ते दिल्ली असा प्रवास केला. आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी हजारो शेतकरी सहारनपूर येथून पायी जात आहेत. नोएडा ते दिल्लीकडे जाणारे शेतकरी आपल्या मागण्यांचा निषेध करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
दिल्ली -मेरठ एक्सप्रेस वेवर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सीआरपीएफचे जवानही येथे तैनात केले आहेत. उड्डाणपुलाच्या वर आणि खाली सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. पोलीस शेतकऱ्यांना दिल्लीकडे येण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शनिवारी सकाळी शेतकरी नोएडाच्या ट्रान्सपोर्ट नगरहून ट्रान्सपोर्ट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे तसेच परिस्थिती चिघळू नये म्हणून दिल्ली पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान,
भारतीय किसान संघटनेचे उपाध्यक्ष राधे ठाकूर यांनी आपल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. सहारनपूर ते दिल्ली पर्यंत गेलेल्या ‘किसान-मजदूर यात्रे’मध्ये हजारो शेतकरी सहभागी आहेत. सहारनपूर ते दिल्ली पर्यंतचे शेतकरी पायी प्रवास करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून शेतकरी आर्थिक परिस्थितीशी झगडत आहे आणि केंद्रातील सरकार हातावर हात घेवून बसले असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. तसेच आपल्या मागण्या सरकारसमोर आपण ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.