१२ वर्षांनंतरही सेवा ढेपाळलेलीच; पालिकेसाठी बीआरटी ठरतोय पांढरा हत्ती
पुणे – पुणेकरांना जलद वाहतूक सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून देशातील बीआरटीचा पहिला पायलट प्रोजेक्ट 2006 मध्ये पुण्यात राबविण्यात आला. मात्र, गेल्या 12 वर्षांत हा पायलट प्रोजेक्ट अजूनही पायलट स्वरूपातच असून या एका तपाच्या कालावधीत तब्बल 1 हजार 13 कोटी रुपये महापालिकेकडून बीआरटी मार्गावर खर्च करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही जलद वाहतूक सोडाच पण सुरक्षित आणि नियोजित वेळेतही ही वाहतूक सेवा अद्याप पुणेकरांना मिळालेली नाही. त्यामुळे शहरातील बीआरटी आता पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरू लागली आहे.
दरम्यान, जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेकडून शहरात सुमारे 112 किलोमीटरचे बीआरटीचे जाळे उभारण्याचे नियोजन होते. मात्र, 12 वर्षांत केवळ 30 किलोमीटरचा मार्गच प्रशासनाला उभारणे शक्य झाले आहे.
सुधारणेवरच भरमसाठ खर्च
महापालिकेस केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत बीआरटी योजनेसाठी निधी मिळाला होता. या निधीतून बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांची निवड करून या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर केवळ कात्रज ते स्वारगेट आणि स्वारगेट ते हडपसर या दोन पायलट प्रकल्पांसह विश्रांतवाडी ते संगमवाडी आणि संगमवाडी ते नगररस्ता हे दोनच बीआरटी मार्ग प्रशासनाला सुरू करण्यात यश आले. या सर्व मार्गांची लांबी केवळ 30 किलोमीटरची आहे. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधींची उधळपट्टी केली जात आहे.
प्रशासनाकडून हे बीआरटी मार्ग केल्यानंतर त्यात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. त्यामुळे वारंवार होणारे अपघात, बीआरटी मार्गाचा इतर वाहतुकीसाठी होणारा वापर यामुळे या मार्गाचे सुरक्षा ऑडिट पालिकेकडून करण्यात आले. त्यात मार्गांच्या अनेक त्रुटी समोर आल्या. त्यामुळे आता गेल्या काही वर्षांत या मार्गांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने जवळपास 250 कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे बीआरटी मार्गावर बस सेवेचा बोजवारा उडालेला असतानाच दुसऱ्या बाजूला देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी सुरूच आहे.
स्वतंत्र मार्गिकाच नाहीत
बीआरटी सेवा सुरू करताना जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका केल्या होत्या. मात्र, गेल्या 12 वर्षांत पायलट प्रकल्प असलेल्या कात्रज ते स्वारगेट मार्गात अवघी अडीच किलोमीटर तर, हडपसर ते स्वारगेट मार्गात जवळपास तेवढीच स्वतंत्र मार्गिका शिल्लक आहे. सातारा रस्त्यावर जागोजागी उड्डाणपूल, भुयारी मार्ग झाल्याने बीआरटी मार्गच संपुष्टात आला आहे. तर, हडपसर रस्त्यावरही हीच स्थिती आहे. त्यातच, या मार्गाचा वापर सर्वच वाहने करत असल्याने जलद वाहतूक सेवा या मूळ उद्देशालाच हरताळ फासला असल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या कराचे पैसे खर्च झाले. मात्र, केवळ महापालिका आणि पीएमपी प्रशासन आणि पोलिसांकडून या सुविधेबाबत योग्य व्यवस्थापन न केल्याने ही स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आता तरी बीआरटी सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नाहीतर केवळ देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या सेवेसाठी खर्च करून पैशाची उधळपट्टी करू नये.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच