मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र यावेळेस महायुतीच्या जागा कमी झाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.
दरम्यान, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मात्र एकही जागा जिंकू शकली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीतील कामगिरीवर सोशल मीडियावर जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर, सामाजिक, राजकीय न्याय, हक्कांसाठी आपण लढतच राहू !, असे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार ! वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 24 लाखांपेक्षा जास्त मत मिळवली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपण जिंकू जरी शकलो नाही, तरी 10 जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. आणि अनेक ठिकाणी आपण जोरदार टक्कर दिली आहे व तिसऱ्या क्रमांकावर आहोत.
आपण सर्व संघर्षातून उभे राहिलो आहोत. यापुढेही आपण वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू! आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणात त्याच ताकदीने उभी राहील. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर, सामाजिक, राजकीय न्याय, हक्कांसाठी आपण लढतच राहू !