केरळच्या भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त वक्तव
नवी दिल्ली : देशात अगोदरच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. देशातील बहुतांश भागात या कायद्याला विरोध करण्यात येत आहे तर दुसरीकडे सरकारकडून या कायद्याचे समर्थन करण्यासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यातच आता केरळच्या भाजप प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आखाती देशांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हिंदूंना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवले जाईल असे वक्तव्य केरलमधील भाजपा प्रवक्ता बी गोपालकृष्णन यांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
कायद्याचे समर्थन करणाऱ्या आखाती देशांमधील हिंदूंना काहीजण धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंडियन युनिअन मुस्लीम लीगने जातीय घटकांना दूर केले आहे. मात्र आखाती देशातील काही लोक हिंदूंना धमकावत आहेत. अशा लोकांना पाकिस्तानात जाण्यास भाग पाडले जाईल. बहारीन येथे एका केरळमधील हिंदू नागरिकाने कायद्याचे समर्थन केल्याने त्याच्या मालकीच्या हॉटेलला टार्गेट करण्यात आले असल्याचे गोपालकृष्ण यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केरळमधील काही लोकांनाच हॉटेलमध्ये घोषणबाजी करताना दाखवण्यात आलं होतं. सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन केल्यानेच हा निषेध करण्यात आला होता.
केरळ सरकारने एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या निर्णयावर गोपालकृष्णन यांनी नाराजी व्यक्त करत रेशन बंद करण्याची धमकी दिली आहे. मुख्यमंत्री पी.विजयन यांना एनपीआर प्रक्रिया लागू करावीच लागेल, असे नाही झाले तर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्याला रेशन मिळणे बंद होईल,असे गोपालकृष्णन यांनी म्हटले आहे. दरम्यान केरळमध्ये नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याने एका डॉक्टरला राजीनामा द्यावा लागला असल्याची माहिती समोर आली होती. डॉक्टर अजित श्रीधरन यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले होते. डॉक्टर अजित श्रीधरन यांच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.