गेल्या काही महिन्यांच्या शेअर बाजाराच्या उताराला शुक्रवारी चांगलाच ब्रेक लागला आणि तो एका दिवसात 1921 अशा विक्रमी अंशाने चढला. तेजी आणि मंदीतही आपण बाजारात असले पाहिजे, असे का म्हटले जाते, हे अशावेळी लक्षात येते. अर्थमंत्र्यांच्या घोषणांनी बाजाराचा मूड बदलला असून देशाचा मूड त्यानुसार बदलला तर पुढे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याचे दिवस जवळ आले आहेत. म्युच्युअल फंडांचे गेल्या वर्षभरातील रिटर्न चांगले नाहीत, याची चर्चा गेले सहा महिने विशेषत्वाने होत आहे. कारण बाजार गेले काही दिवस हलत नव्हता. ज्यांनी थेट शेअर विकत घेतले होते, त्यांना बरेच नुकसान सहन करावे लागले आहे.
मात्र ज्यांनी एसआयपीचाकिंवा एकरकमी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा मार्ग निवडला, त्यांना मात्र फार तोटा झालेला नाही. यावरून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थेट बाजारात खरेदी विक्री करण्यापेक्षा सुरक्षित रहाते, हे सिद्धच झाले आहे. बाजारातील मंदीच्या काळात आपल्या एसआयपी बंद करू नये, असागुंतवणूक गुरु का सल्ला देतात, हेही लवकरच स्पष्ट होईल. हा सल्ला भारतीय गुंतवणूकदारांनी मनावर घेतलेला दिसतो, कारण मंदीच्या वातावरणाला घाबरून त्यांनी एसआयपीबंद केल्या नाहीत. त्याचा थेट परिणाम म्हणजे एसआयपीच्या मार्गाने सध्या बाजारात तब्बल 8000 कोटी रुपये दर महिन्याला येत आहेत आणि त्यामुळेच परकीय गुंतवणूकदारांनी विक्रीचा भडीमार करूनही बाजार फार पडला नाही. भारतीय गुंतवणूकदार परिपक्व झाला, असे म्हटले पाहिजे.
या सर्व पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड आणि एसआयपीशी संबंधित अनेक प्रश्न गुंतवणूकदाराच्या मनात तयार झाले असतील, ते आपण प्रश्नोत्तराच्या रूपाने समजून घेऊ.
जे टिकून राहिले, त्यांना चांगला परतावा मिळण्याचे दिवस (भाग-२)
प्रश्न – सहा महिन्यांपूर्वी सुरु केलेली इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपी सध्या गुंतवलेल्या मुद्दलापेक्षा कमी झालेली आहे, तर काय करावे?
उत्तर – गुंतवणुकीचा कालावधी अतिशय अल्प आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अस्वस्थ होण्याची गरज नाही. एसआयपी मुळीच बंद करू नये. सदर गुंतवणूक किमान 5 ते 10 वर्षांसाठी सुरुच ठेवावी. या गुंतवणुकीच्या काळात शेअर बाजारात अनेक वेळा चढउतार येणार आहेत परंतु याचमुळे आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढीव परतावा जमा होणार आहे. उदा. 2017 च्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडाच्या अनेक मिडकॅप योजनांच्या मध्ये एसआयपीचा परतावा 25 टक्क्यांपेक्षा जादा मिळाला आहे. यामुळेच गुंतवणूकदाराने एसआयपी सुरु करत असताना दीर्घकालिन उद्दिष्टांसाठीच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. दीर्घकालिन एसआयपी ही नेहमीच किमान देशाच्या आर्थिक विकासाच्या दरापेक्षा जास्त परतावा देऊन जात असते. चढउतार कसे असू शकतात, याची एक झलक शुक्रवारी पाहायला मिळाली. शेअर बाजार अशी उसळी मारेल, याची कल्पना कोणीही केली नव्हती.