मुंबई : राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरूच आहे. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी हे कर्मचारी संप करत आहेत. तर सत्ताधारी नेत्यांनी भाजपावर या संपाला चिथावणी देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच नेत्यांमध्ये आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी भाजपावर अशीच जहरी टीका करत भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत विरोधकांना सुनावले. एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेली आहे. अजूनही परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे.
दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजपावर टीकाही केली आहे. ते म्हणाले, “आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. पण विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या सांगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नये, असे म्हटले.
तसेच उद्या एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झालं तर हे कोणीही नेते येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका”.