मुंबई – विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झालेली आहे. विशेष म्हणजे भाजपला पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हंटले कि, निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्या ताकदीबाबतीचे आकलन आमचे चुकले. परंतु, आता आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू, असे त्यांनी सांगितले.
तसेच, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसेच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.