नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला. सत्यासाठी संघर्ष करणार्यांना धमकावता येत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही समजणार नाही, असा टोला देखील राहुल गांधींनी लगावला.
राजीव गांधी फाउंडेशनला मिळणाऱ्या देणगीवरून वाद चालू असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र सरकारने चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. यामुळे राहुल गांधींनी सरकारवर टीका केली.
मोदीजी समजतात जग त्यांच्यासारखे आहे. प्रत्येकाची किंमत आहे किंवा त्यांना धमकावले जाऊ शकते. मात्र ते कधीही समजू शकणार नाहीत सत्यासाठी संघर्ष करणार्यांचे काही मूल्य नसते आणि त्यांना धमकावले जाऊ शकत नाही.
महत्त्वाचे म्हणजे राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दूतावासातून निधी मिळाल्याचा भाजपच्या आरोपानंतर सरकारने सुमारे दोन आठवड्यांनंतर हा निर्णय घेतला. लडाखमधील भारतीय लष्कर आणि चीन सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षांदरम्यान हा आरोप झाला.