मुंबई – बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या दाव्यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांना हा दावा मान्य आहे का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात,”अयोध्या आंदोलनात शिवसेना नव्हतीच हा दावा भाजपा करत आहे शिंदे यांना हा दावा मान्य आहे ? नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा. मींधे गटात कोणी खऱ्या आईचे दुध प्यायलेला आहे का जो शिवसेना प्रमुखांच्या अपमाना विरोधात मंत्री पदाचा राजीनामा देईल” असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील नेमकं यावेळी
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पडली त्यावेळेसचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले
यावर मुलाखतकाराने बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते का ? असा स्पष्ट सवाल विचारला त्यावर पाटील म्हणाले, “बाबरी ज्यांनी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असे सांगितले होते असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.