पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा अजितदादांनी कायापालट केला, शहराचे नंदनवन केले. अनेक अनेक लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना पदे दिली. दादांनी अनेकांवर प्रेम केले. मात्र, त्यांनी ज्यांना आमदार, महापौर, केले त्यांनीच शहरात पक्षाचा कार्यक्रम केला. दादांनी चुकीच्या माणसांवर प्रेम केले, ताकद दिल्याचेच परिणाम आज पहावयास मिळत असल्याची बोचरी पण मार्मिक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी अजित पवार यांच्यासमोरच केल्याने पक्ष सोडून गेलेल्यांच्या विरोधातील खदखद पुन्हा पहावयास मिळाली.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा या मेळाव्याचे शनिवार (दि.6) रोजी चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भोईर बोलत होते. पुढे बोलताना भोईर म्हणाले, पुर्वी शहरात भाजपचे तीन-चार नगरसेवक निवडून येत होते. भाजपने शहरासाठी काय केले, आपलीच काही लोक त्यांच्याकडे गेली. ज्यांच्यावर दादांनी प्रेम केले. त्यांनीच दादांचा घात केला. दादांनी चुकीच्या माणसांवर प्रेम केल्याने त्यांनीच कार्यक्रम केल्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली.अजितदादांच्या जवळ असणारे चुकीचे कोंडाळे आमचा कार्यक्रम करत होते. तरीही मी तग धरत “समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नही मिलता’ या धोरणानुसार काम करत राहिलो.
ज्यावेळी चुकीचे कोंडाळे दुर गेले त्यावेळी मी दादांजवळ आलो. काही वाटले नाही. पदे येतात-पदे जातात. अनेक महापुरूष होऊन गेले, ते साधे सरपंच सुध्दा नव्हते. काम करा. निर्धार पक्का करा. दादा आले की सर्व जण गोळा होतात. मात्र, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी हाक दिली तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही संघटनेतून घडलो आहोत. आम्हाला शॉर्ट कटने काहीच मिळाले नाही. आनंद एकाच गोष्टीचा आहे की ज्या कार्यकर्त्याची वाटचाल संघटनेतून होते तो कार्यकर्ता कधीच संपत नसतो, असेही भोईर म्हणाले.
सगळाच कारभार “मॅनेज’
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पाच वर्षांत सगळाच कारभार मॅनेज करून करण्यात आला. या पाच वर्षांत शहराची अक्षरश: वाताहत झाली. नियंत्रण ठेवणारा नेताच नसल्याने अमर्यादीत भ्रष्टाचार करण्यात आला. शहराच्या विकासात राष्ट्रवादीचे काय योगदान आहे आणि त्यांनी पाच वर्षांत काय केले याबाबत भाजपच्या कोणत्याही तत्वज्ञात्यासमोर खुली चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही आव्हान भोईर यांनी यावेळी दिले.