मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच “मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची” उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.
अनेक हिंदी- मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाचा समाचार घेतला आहे. ‘ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस? अशा शब्दांत कंगनावर टीका होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, यानंतर आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष ‘अमेय खोपकर’ यांनी सुद्धा कंगना रनौतच्या या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगनाला चांगलेच सुनावले आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
अमेय खोपकर म्हणाले कि, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही’. अश्या आशयाचे ट्विट खोपकर यांनी केले आहे.