विषारी प्रजातीतील असल्याने तोडण्यात गैर नसल्याचे वनस्पती अभ्यासकांचा दावा
पुणे – स.प. महाविद्यालयात रातोरात झालेल्या वृक्षतोडीबाबत समाजातील सर्व स्तरातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. एकीकडे वृक्षतोडीची परवानगी प्रक्रिया आणि अंमलबजावणी चुकीची असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, तोडण्यात आलेली सर्व झाडे ही “सुबाभळी’ या विषारी प्रजातीतील झाडे असल्याने ती तोडण्यात काहीच गैर नसल्याचे वनस्पती अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांची गुरुवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. ती स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी या ठिकाणी काही जुने पूर्ण वाढ झालेले वृक्ष कापण्यात आले आहेत. महाविद्यालय आणि महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा मोदी यांच्या सभेशी कोणताही संबंध नाही.
मात्र, या सभेसाठी अडथळा ठरत असल्यानेच ही झाडे तोडली जात असल्याचे नागरिकांकडून आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. तसेच विभागाच्या परवानगी पत्रानुसार केवळ काही फूट छाटणी करण्यासाठी परवानगी असताना पूर्ण झाड कापणे कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी या वृक्षतोडीबाबत रोष व्यक्त केला आहे. अशाप्रकारे तातडीने अशास्रतीय पद्धतीने होणारी वृक्षांची कापणी संशयास्पद असून, त्याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे संदीप सोनावणे यांनी केली आहे.
शहरातील वृक्षांचे भवितव्य धोक्यात
महापालिकेकडून वृक्ष कापणीची परवानगी देण्यापूर्वी एक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात ही प्रक्रिया योग्यप्रकारे झाली नाही. शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने झाडे कापली जातात. याबाबत कोणीच काही बोलणार नाही, असे गृहीत धरून मनमानी पद्धतीने वृक्षांची कापणी केली जाते. त्यामुळेच शहरातील वृक्षांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे मत वृक्ष संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते सत्या नटराजन यांनी व्यक्त केले.
…परंतु नियमांचे पालन व्हावे
स. प. महाविद्यालयातील कापण्यात आलेली झाडे ही “सुबाभूळ’ प्रकारातील आहे. ही झाडे विदेशी प्रजातीची असून, स्थानिक पर्यावरणासाठी विषारी ठरतात. त्यामुळे ती तोडल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र, हा नियम सरसकट सर्व झाडांसाठी लावणे योग्य नाही. झाडे तोडण्यासाठी वृक्ष संवर्धन कायद्यांतर्गत एक प्रक्रिया नेमून दिली आहे. त्या प्रक्रियेचे पालन होणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.