नवी दिल्ली : देशात लॉकडाउनची स्थिती असतानाही करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील कानपुर जिल्ह्यात तीन तबलिगींना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरूवातील त्यांनी डॉक्टरांना उपचारासाठी कोणतेही सहकार्य केले नसल्याची माहिती समोर आली होती. कथितरित्या ते तबलिगी डॉक्टराच्या अंगावर थुंकल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. परंतु आता ते डॉक्टरांकडे आपले प्राण वाचवण्याची विनंती करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या करोनाग्रस्त तबलिगींची प्रकृती बिघडत असल्याचं समोर आलं. त्यावेळी त्या तिघांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे आपले प्राण वाचवण्याची विनंती केली. दरम्यान या प्रकरणी सीएमओ अशोक शुक्ला यांच्याशी काही माध्यमांनी संवाद साधला.
“सुरूवातीला ते तिघं वेळेवर औषधांचे सेवन करत नव्हते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही ते सहकार्य करत नव्हते. परंतु आता ते डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यानी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत आहे. त्यांचे रडणे, विनंती करणे या सर्व मानसिक बाबी आहेत. ज्यावेळी कोणी जास्त घाबरतं, त्यावेळी ते अशा प्रकारे वर्तन करतं,” असेही ते म्हणाले.